मा. नानासाहेब पटोले, अध्यक्ष,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.


मोदींनी सन २०१४ आणि २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत जी आश्वासने दिली होती, ती पूर्ण केली नाहीत. नोकरी देण्याचे आश्वासन देऊन तरुणांना फसवले, शेतमालाला दीडपट भाव देणार आणि उत्पन्न दुप्पट करणार असे सांगून शेतकऱ्यांना फसवले. कामगारांना देशोधडीला लावले. त्यामुळे मोदींनी आपल्याला फसवल्याची भावना आज जनसामान्यांमध्ये आहे. मोदी सरकारबद्दल लोकांमध्ये तीव्र असंतोष आहे. हाच संताप आज निवडणूक प्रचारात जागोजागी दिसून येत आहे. जनतेला लुटायचे आणि मूठभर धनदांडग्यांचे खिसे भरायचे याला विकास म्हणायचे काय? असा प्रश्न संतप्त मतदार विचारत आहेत. पंतप्रधान ‘मोदी गॅरंटी’ वर कितीही भर देत असले तरी जनता त्यावर विश्वास ठेवत नाही. देशात आज सर्वत्र काँग्रेस आणि इंडिया आघाडीला पोषक असे वातावरण आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे. मोदींच्या हुकूमशाहीला कंटाळलेले लोक मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी बाहेर पडत आहेत. राहुलजींच्या नेतृत्वाचा हा विजय आहे. तरुण, शेतकरी, महिला व कामगार मोठया संख्येने मतदान करीत आहेत.
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजप आणि महायुतीचा दारुण पराभव होणार हे अटळ आहे. – गेली १० वर्षे सत्तेची हवा डोक्यात गेल्यामुळे अहंकार आणि आम्ही केले तेच बरोबर अशी भाजपची मानसिकता झाली आहे. भाजपचे नेते देशातील महागाईवर आणि बेरोजगारीवर चर्चा करीत नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करीत नाहीत. गरीबीवर चर्चा करीत नाहीत. त्याऐवजी सर्वसामान्यांशी निगडीत नसलेले मुद्दे माध्यमांद्वारे समारे आणायचे आणि मूळ मुद्यांपासून लोकांना डायव्हर्ट करायचे हाच धंदा भाजपने गेल्या १० वर्षात केला आहे. पण आता असे चालणार नाही. कारण इंडिया आघाडीला निवडून द्यायचे ही मानसिकता मतदारांनी बनवलेली आहे. जाती- धर्माच्या मुद्यांपलिकडे मतदान करण्याचा निर्णय आता मतदारांनी घेतला आहे. या निवडणूकीत लोकच आता हुकूमशाहीचा अंत करुन देशात आणि राज्यात लोकशाहीवादी सरकार सत्तेवर आणतील.

काँग्रेस पक्षाला निवडणूका लढवता येऊ नयेत म्हणून पक्षाची खाती गोठवली आहेत. खरे तर हा काँग्रेस पक्षाची फक्त खाती गोठवण्याचा प्रकार नसून देशातील लोकशाही गोठवण्याचा प्रकार आहे. एकीकडे विरोधी पक्षाची आर्थिक कोंडी करायची आणि दुसरीकडे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची खंडणी वसूल करायची असा प्रकार भाजपने केला आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या खोटारडेपणाला देशातील शेतकरी, बेरोजगार युवक वैतागले आहेत. राज्यातील युवकांना नोकऱ्या मिळत नाहीत; अशी परिस्थिती आहे. त्यातच महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्याचे महापाप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. म्हणूनच देशातील युवकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत असंतोष आहे.

२०१४ मध्ये निवडणूकीच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी सरकार आले की पहिली सही शेतकरी कर्जमाफीच्या फाईलवर करीन असे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, हमी भाव देणार अशी आश्वासने त्यांनी यवतमाळ येथील जाहीर सभेत दिली होती. पण १० वर्षे सत्ता उपभोगूनही त्यांनी ती आश्वासने पूर्ण केली नाहीत. मोदींनी शेतकऱ्यांना सतत फसवण्याचेच काम केले आहे. कांदा नाही खाल्ला तर काही फरक पडत नाही, असे भाजपच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन म्हणाल्या होत्या. केंद्राने ८ डिसेंबर २०२३ पासून महाराष्ट्रात कांदा निर्यातीस बंदी घातल्याने नाशिक, पुणे, जळगाव, अहमदनगर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप पसरला. राज्यातील शेतकऱ्यांनी यावरुन अनेकदा आंदोलनेही केली आहेत. असे असताना फक्त गुजरातमध्ये पिकणाऱ्या पांढऱ्या कांदयाच्या निर्यातीस केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने २५ एप्रिलला परवानगी दिली. त्यानुसार गुजरातचा २००० मेट्रीक टन कांदा परदेशात निर्यातीस परवानगी मिळाली. यातून मोदी सरकार हे महाराष्ट्रद्वेषी आणि शेतकरी विरोधी आहे हे स्पष्ट झाले आहे. या शेतकरी विरोधी भाजपा सरकारचा लोकसभा निवडणूकीत करेक्ट कार्यक्रम करण्याची वेळ आली आहे. आज शेतकरी संकटात आहे त्याला भाजपचे सरकार जबाबदार आहे.काँग्रेसने नेहमीच जनतेच्या आणि शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. मात्र मोदी सरकारने गेल्या १० वर्षात फक्त मुठभर लोकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आपल्या देशातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी दिल्लीच्या सीमेवर आणि रामलीला मैदानावर आंदोलने केली आहेत. मोदी सरकारने २२ अरबपर्तीचे १६ लाख कोटींचे कर्ज माफ केले आहे; परंतु, शेतकऱ्यांचे एकही रुपयाचेही कर्ज माफ केलेले नाही. मात्र काँग्रेस प्रणित ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर परिस्थिती बदलणार आहे. काँग्रेसचे दरवाजे सतत शेतकऱ्यांसाठी खुले असणार आहेत. इंडिया आघाडीचे सरकार शेतकऱ्यांना जीएसटीतून वगळणार, पीक विमा योजनेची पुनर्रचना करणार आहे.

देशात पिक विमा योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होण्याऐवजी केवळ कंपन्यांना होत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्यांना मदत मिळत नाही; हे चित्र काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर बदलणार आहे. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पिक विमा योजनेची पुनर्रचना केली जाणार आहे. निर्यात धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसणार नाही; याची काळजी घेतली जाणार आहे.

देशाची आजची परिस्थिती चिंताजनक अशी आहे. देशात आज शेतकरी समस्या, बेरोजगारी, महागाई आणि भागिदारी हे मूळ मुद्दे आहेत. मोदी सरकारने श्रीमंतांना अति श्रीमंत, गरीबांना अति गरीब करण्याबरोबरच देशाला कर्जबाजारी करुन ठेवले आहे. देशातील जनतेला दिलासा देण्यासाठी त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राहुल गांधींनी पदयात्रा काढून संपूर्ण देश पिंजून काढला. कन्याकुमारी ते काश्मीर ४००० किलोमीटरची पदयात्रा केली. मणिपूर ते मुंबई ६७०० किलोमीटरची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ काढली. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता राहुल देशभर चालले ते केवळ देशातील जनतेसाठी! मात्र लोकसभा निवडणूकीत पराभव स्पष्ट दिसू लागल्याने भाजप आणि महायुतीच्या नेत्यांकडून राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला बदनाम करण्याचे काम केले जात आहे. गद्दारी करुन सत्ता मिळवणाऱ्यांना राहुल गांधी व गांधी कुटुंबियांचा त्याग आणि बलिदान काय कळणार ? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मोदी सरकार सत्तेवर येईपर्यंत भारताने जगाच्या पाठीवर ताठ मानेने विकासाची विविध क्षेत्रे पादांक्रांत केली. त्यावेळी देशात जर नैराश्याचे वातावरण असते तर एवढी प्रगती झालीच नसती. मात्र आता नरेंद्र मोदी आणि भाजप हे राहुल गांधींचा जनाधार पाहून नैराश्येच्या गर्तेत गेले आहेत. त्यामुळे त्यांना सर्वत्र निराशाच दिसू लागली आहे. मोदी सरकारने १० वर्षाचा प्रदीर्घ कार्यकाळ फक्त काँग्रेसला शिव्या देणे, प्रभूरामाच्या नावावर मते मागणे आणि जनतेची दिशाभूल करुन जीएसटीच्या माध्यमातून लाखो करोडो रुपये लोकांच्या खिशातून वसूल करणे यामध्ये घालवला आहे. मोदींनी १० वर्षाच्या काळात जनतेच्या खिशावर दरोडा टाकून अदानींचे घर भरण्याचे काम केले आहे. काँग्रेसने ६० वर्षात देश उभा करण्यासाठी ज्या सरकारी संस्था स्थापन केल्या त्या विकून देश चालवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. निवडणूका आल्या की शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. परंतु, त्यांच्याच हस्ते सन २०१६ मध्ये अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक बनवण्याच्या जलपूजनाचा कार्यक्रम झाला असताना आज पर्यंत या सरकारने शिवस्मारकाची एकही वीट रचलेली नाही. निवडणूका आल्यानंतरच भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते.